समाजाला निसर्गप्रेमी संदेश देवून गेला ‘रानकवी’ !

समाजाला निसर्गप्रेमी संदेश देवून गेला ‘रानकवी’ !

समाजाला निसर्गप्रेमी संदेश देवून गेला ‘रानकवी’ !

मेधा पाटकरांची ना. धों. महानोर दादांना यादभरी श्रद्धांजली..व शब्दांजली !!


महानोर दादा गेले ! २ जून रोजी त्यांची भेट झाली होती, जळगावच्या हॉस्पिटल- मध्ये... तेव्हाही अनेक आजारांच्यापलिकडे जाणवली होती, ती त्यांची उर्जा, शब्दाशब्दातली आणि भावभावनांसह जोडलेल्या विचारांची. पर्यावरण ते राजकारण... हा होता त्यांचा व्यापक नजरिया! आज अचानक देहान्ताची दुःखद खबर मिळाली तेव्हा आठवणी उसळून आल्या...दादांच्या नर्मदेशीच नव्हे तर भवतालातील निसर्गाशी ते वाचवण्यासाठीच चाललेल्या 38 वर्षांच्या जनआंदोलनाशी असलेल्या नातेबंधाच्या !!


'रानकवी' म्हणून गाजलेले महानोरदादा हे जल, जंगल, जमिनीशी जोडलेल्या प्रदीर्घ प्रवासातच कविता रचत होते. त्यांच्या कवितेतून ज्वारीच्या कणसाला- ही फुलवून दाखवत, तेव्हा आपल्याही निसर्गाविषयीच्या भावना उमलून येत असत! पण त्यांच्या पलासखेडे गावात रामदास भटकर जी, विजयाताई चौहान आम्ही सारे पोहोचलो तेव्हा त्यांचा निसर्ग-परिवार भेटला.

सीताफळांनी लगडलेली बाग-बगीचा आणि त्यांचे मातीत बरेच काही रुजवणारे हात ! त्यांच्या पत्नी, सुलोचना वहिनी व मुलेबाळे सर्वांना धरातलावर उतरवत ते जगत होते, हेच खरे!

एकीकडे जैन इरिगेशनच्या भवरलालजींचे तर दुसरीकडे शरद पवारजींचे ते जवळचे स्नेही ! जैन संस्थेतील सर्व कार्याशी घनिष्ठ संबंध ठेवून त्यांनी आम्हालाही भवरलालजींचे 'मोठी नकोत, लहान धरणेच हवीत' हा विचार ऐकवून त्यांच्यासह सुंदर वार्तालापात ओढले.

महानोर दादांचे निसर्ग-मानवातील नात्याविषयीचे लेखन, काव्य व आज तेच संपवत चाललेल्या विकासाविषयीचे परखड भाष्य, वैविध्य, जैविकता याबरोबरच शेती-शेतकरीस न मिळणारा स्थान-सन्मान, या साऱ्या बाबत होते... म्हणूनच तर ते नामदार झाले, जनप्रतिनिधी राहिले.

कधी शेतकरी दिंडीत पुढाकार घेते झाले व नर्मदा-सरदार सरोवर संबंधी सरकारने नेमलेल्या समितीचे सदस्यही राहिले, पण आम्हाला जोडून ठेवून पारदर्शी, जवाबदेही राहिल्याने सारे कागद, चर्चा खुली करत!

दादांसह अजिंठा लेणी पहायला गेलो. त्यांचा लेण्यांचा इतिहासच. नव्हे तर पहाडाखालच्या गावातील माणसे व पिढ्यांची प्रतीके यांचा अभ्यास व बाजारी आक्रमणापासून हे पुरातत्त्व वाचवण्याचा ध्यास अनुभवला. पारोच्या समाधी जवळ बसून त्यांनी भावविश्वच उलगडून दाखवले. तिथला फोटो कसा कोण जाणे, आज, दादा गेल्यावर माझ्यापर्यंत पोहोचला.

शेतकरी, कष्टकरी समुदायांविषयी महानोर दादांची आर्त दृष्टी जेव्हा ते नामदार झाले, तेव्हा विधानसभेत उठवलेल्या अनेकानेक प्रश्रांमधून पाजळली. परंतु ते एक असे प्रतिनिधी होते कि मंचावर बसून न राहता गावोगावी फिरायचे. झोपड्या घरातून, शेतातून पार होत, त्यांचे जगणे समजून भूमी सुधार सारख्या मुद्यांनाही भिडायचे.

आज राजकारण एकमेकांवर शेण फेकणारे झाल्याने, दादा खंत व्यक्त करायचे. पलासखेडयातील शेती, सुलोचना वहिनींमुळे त्यांचा आधार राहिली. तिथेच शेतक-यांच्या समस्यांची पाळंमुळंही उखडत गेली.

दादांना राजकारणातही खूप बरे वाईट, कडवट अनुभवही आले "कविता बंद करा " च्या धमक्याही परंतु त्यांनी सहन केले ते बहुधा मनभरच्या नैसर्गिकतेच्याच बळावर ! कुटुंबातील उतारचढावही, ते सोसत राहिले तरी किती पुरस्काराचे धनी झाले.

कुसुमाग्रज, कवि ग्रेस, बा. भ. बोरकर, पुलं म्हणजे भाई, भालचंद्र नेमाडे ते लता मंगेशकर अन् आशाताई भोसले सर्वांचे प्रेम हे सत्कारापेक्षा मोलाचे मानून लेखात टिपले 'सुलोचनाच्या पामुलखुणा' या, शेवटच्या की काय, पुस्तकात जपले.

एका शेतमजुराच्या घरी जन्मलेला हा रानकवी, परिवर्तनजीवी आज गेला. २ जून रोजी त्यांना जळगावमध्ये भेटलो तेव्हाही तो 'रानकवी' त्यांच्या बोलघेवड्‌या संवादातून प्रकटत राहिला. आमचे-श्रमिक नवीन मिश्राजींच्या सुरात त्यांना नदीचे गाणे ऐकवले, उभ्याउभ्या. 'पर्बतकी चिट्टी ले जाना, तू सागर की ओर नदी तू बहती रहना, रेवा तू बहती रहना.-' तेव्हा तेही भारावून गेले!

आज अचानक निवर्तले तरी सारे शब्दसंभार व निसर्गप्रेमी, कष्टभावी, साने गुरुजी ते गांधीजींची, त्यांना पटलेली व त्यांनी स्वत: जगलेली जीवनप्रणाली मागे सोडून आम्हा सर्वांसाही संदेश म्हणून!

ना. धों. महानोर दादांना मनस्वी श्रद्धांजली. हीच शब्दांजली !!

 

 

 

मेधा पाटकर

नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या

MediaBharatNews

Related Posts

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!